विना परमिट वाहतुक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी
प्रादेशिक परिवहन खाते कारवाई का करत नाही; संतप्त रिक्षा परमिट धारकांचा सवाल

प्रतिनिधी – रिजवान मुकादम ( पुरार ) गोरेगांव – नांदवी प्रवासी वाहतुक करणाऱ्या परमिट धारक रिक्षा चालकांकडून विना परमिट, विना इंश्युरन्स, पि. यु. सी नसलेल्या तसेच प्रायव्हेट रिक्षा चालकांवर कारवाईची करण्याची मागणी गोरेगांव नांदवी रिक्षा संघटनेच्या सदस्यांकडून करण्यात येत आहें.
महाराष्ट्र शासनाने वयोवृद्ध नागरिकांना व महिलांना एस. टी. बस प्रवासामध्ये अर्धा तिकीत स्विकारून प्रवास करण्याची सवलत दिली असल्यामुळे रिक्षा व छोट्या प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर याचा निश्चितच परिणाम झाला आहे तरी देखील रिक्षा चालक उन्हाळा असो किंवा पावसाळा रिक्षा प्रादेशिक परिवहन खात्याच्या नियमांचे पालन करत प्रवाशांची वाट बघत दिवस भर रांगेत राहातात. कधी कधी उदरनिर्वाहासाठी घरातून बाहेर पडलेले असताना दिवसभर थांबून देखील भवानी न करता घरी जाण्याची वेळ या रिक्षा चालकांवर येत असते. रिक्षा चालक म्हटले की, अर्ध्या रात्री प्रवाशांना त्यांच्या ठिकाणांवर मग ताे रस्ता, मार्ग अडगळीचा असला तरी तो त्याची पर्वा न करता गरज असणाऱ्या किंवा आजारी लोकांना दिवसा असो किंवा रात्र सुरक्षितरित्या पोहचवण्याची जबाबदारी पार पाडतो. प्रवाशांची सेवा देऊन आपला उदरनिर्वाह करत असतात.
माणगांव तालुक्यातील गोरेगांव नांदवी रिक्षा चालक मालक संघटने अंतर्गत चालणाऱ्या प्रवासी वाहतुक करणारे रिक्षा चालक देखील अशाच प्रकारे आपला उदरनिर्वाह करीत आहेत परंतु परमिटधारक रिक्षा चालकांवर आता उपासमारी सोबत जिव देण्याची वेळ प्रादेशिक परिवहन खात्याच्या महेरबानीने आली आहे. गोरेगांव नांदवी रिक्षा लाईन मध्ये शंभर पेक्षा अधिक प्रवासी रिक्षा असून यामध्ये अनेक रिक्षा विना परमिट खाजगी रिक्षा आहेत तर अनेक रिक्षांना १५ वर्ष झालेली आहेत त्यांना प्रवासी वाहतुक करण्याची मान्यता नाही शिवाय अनेकांचा विमा संपला आहे तरी देखील हे रिक्षा चालक बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करीत आहेत असे असताना प्रादेशिक परिवहन खाते तसेच स्थानिक वाहतुक पोलिसांकडून रिक्षा वाहनांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे गोरेगांव नांदवी रिक्षा संघटनेतील परमिट धारक रिक्षा चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच गोरेगांव नांदवी अनाधिकृत पणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या विना परमिट रिक्षावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरेगांव नांदवी रिक्षा वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे.
या विनापरवाना, अनाधिकृतपणे विनापरवाना प्रवासी वाहतुक करित असताना अपघात घडला तर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जबाबदार कोण ? रिक्षा चालक जे विनापरवाना विना इंश्युरन्स, विना पि. यु. सी., मुदत संपलेली असताना प्रवाशांच्या जिवाशी खेळ करीत आहेत ते कि प्रादेशिक परिवहन खाते आणि वाहतुक पोलिस जे या अनाधिकृतपणे वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत ते ? अनाधिकृतपणे प्रवासी वाहतुक करताना अटी – नियमांची पायमल्ली होत असताना का या खात्यांकडून कारवाई होत नाही ? इतर खात्याप्रमाणे या खात्यालाही हप्ते घेऊन गप्प बसण्याची सवय लागली आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न प्रवासी वर्ग तसेच नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
अनाधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी रिक्षा चालकांविरोधात कारवाई होत नसल्याने गोरेगाव नांदवी रिक्षा संघटनेच्या परमिट धारक चालकांच्या संतापाचा व्हिडीओ व्हायरल