माणगाव ते दिघी महामार्ग ठरतोय वरदान
पाच वर्षांत एकही खड्डा नाही; २४६ कोटी रुपये खर्च, सर्वसामान्यांना मोठा दिलासा.....!

प्रतिनिधी – महेश शेलार ( माणगांव ) कोकणातील रखडलेला, खड्डेमय झालेला, अर्धवट असलेला, अद्यापही कामं सुरू असलेला, रस्त्याची चाळण झालेला, आंदोलने सुरू असलेला, प्रवाशांच्या गैरसोयीचा असलेला, पर्यटकांची हाड खिळखिळी करून टाकत असलेला , प्रवाशांची ओरड आणि बोंबाबोंब सुरू असलेला, अपघातांचे कारण ठरलेला, शेकडो जणांचे नाहक बळी घेणारा आणि कायमस्वरूपी अपंगत्व आणणारा मुंबई ते गोवा महामार्ग पाहिला तर हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र दिसत आहे. याला अपवाद ठरलाय तो माणगाव शहरातून जाणारा माणगाव ते दिघी महामार्ग…
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २०१९ मध्ये ८० किलोमीटरचा रस्ता २ वर्षांत बांधून हा दुहेरी मार्ग पूर्ण केला. या रस्त्याचे संपूर्णपणे मजबूत काँक्रीटीकरण आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम जे.एम. म्हात्रे प्रा.लि.कंपनी या पनवेल येथील अनुभवी ठेकेदाराने घेतले होते. त्यांनी ते प्रामाणिकपणे वेळेत पूर्ण केले. या महामार्गाचे काम केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःहून दिले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर कॉन्ट्रॅक्टर जे.एम. म्हात्रे यांना हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी स्टेट बँकेच्या माध्यमातून कमी व्याज आकारुन कर्ज देताना केंद्र सरकारची हमी त्यांनी दिली हे उल्लेखनीय आहे.
हा महामार्ग दुपदरी करताना कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी किंवा गाजावाजा करण्यात आला नाही. या महामार्गाची थेट २०१७ साली सुरवात करण्यात आली. हा महामार्ग पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा पाया सहा फूट खोल आणण्यात येऊन डबर, मोठी खडी, लहान खडी, वाळू, ग्रीट, उच्च दर्जाचे सिमेंट वापरले गेले आहे. हे करताना वारंवार मोठमोठे वजनदार रोलरचा वापर करून भक्कमपणे दाब देऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. हा मार्ग मुळ जमीनी पासून चार फूट उंच करण्यात आल्याने महापुरात या मार्गावर पुराचे पाणी शिरले नाही. यापूर्वी या मार्गावर दरवर्षी पुराचे पाणी तुंबून मोर्बा पुल बंद करण्यात येत असल्याने शेकडो गावांचा काही दिवस संपर्क तुटत होता. आता एकदाही मोर्बा पुलावरून पाणी गेले नाही हे विशेष ठरले.
या मार्गावरील मोर्बा साई आणि म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात अत्यंत तीव्र उतार आणि चढणी होत्या. त्यांचे सपाटीकरण करून हा घाट वाहतूक आणि दळणवळणास सोपा तसेच सुलभ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शेकडो छोटे मोठे पुल, साकव आणि मोऱ्या बांधण्यात आल्या. एकाच वेळी माणगाव, मोर्बा, साई, म्हसळा आणि दिघी या ठिकाणी बांधकामे सुरू करण्यात आली. त्यामुळे हा महामार्ग वेळेत पूर्ण होण्यासाठी मदत झाली. प्रत्येक गावाच्या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त केले. या महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी एकूण २४६ कोटींची तरतूद करण्यात आली होती.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दुतर्फा सुमारे एक लाख झाडे वनखात्याच्या वतीने लावण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत हा महामार्ग हिरवाईने नटलेला दिसणार आहे. तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी गतीरोधक, रिफ्लेक्टर, ठिकठिकाणी मार्ग फलक, रात्री चमकणारे पांढरे पट्टे तयार करण्यात आले आहेत. या महामार्गासाठी १९६५ सालातच शेतकऱ्यांना जमीन मोबदला देऊन बहुतेक जमीनी संपादीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रस्ता बांधकाम करणे सुलभ आणि सोपे झाले.
या महामार्गासोबतच इंदापूर ते दिघी हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. आता दिघी येथे आंतरराष्ट्रीय बंदराला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा आणि मुरुड हे तालुके विकासाच्या नव्या महामार्गावर येऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. भविष्यात दिघी ते माणगाव रेल्वे मार्ग आणि चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या सर्व भूभागाचा विकासात्मक कायापालट होणार आहे हे जाणून कौशल्य विकास आधारीत कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. जेणेकरून स्थानिक पातळीवर रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. या दोन्ही महामार्गाचे उद्घाटन २३ एप्रिल २०२३ रोजी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे करण्यात आले होते.