दक्षिण रायगड जिल्ह्यातील वाहन चालकांना आर.टि.ओ. कार्यालयाची प्रतिक्षा
माणगांव तालुका रिक्षा व मिनी डोअर चालक आणि मालक संघटनेचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे यांच्या पाठपुराव्याला यश ?

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरात दक्षिण रायगड जिल्ह्यासाठी आर.टि.ओ. कार्यालयासाठी संजय अण्णा साबळे यांनी गेली २० वर्षे पाठपुरावा केला आहे. यासाठी आ. भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनी सुमारे १६ कोटी रुपयांची अर्थिक तरतूद केली असल्याची माहिती मिळते मात्र अद्यापही दक्षिण रायगड जिल्ह्यातील वाहनचालक आर.टि.ओ. कार्यालयाच्या प्रतीक्षेत आहेत.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी माणगावातील मुंबई गोवा महामार्गा जवळील माणगाव शहरापासून केवळ ३ किमी अंतरावर असणाऱ्या मुगवली फाट्या नजीक असणाऱ्या जावळी येथील गट क्रमांक ७३ मध्ये सुमारे १५ एकर गुरुचरण जमीन महाराष्ट्र शासनाने आरक्षित केली आहे. हि जमीन आरक्षित करण्यासाठी शहरातील माणगाव तालुका रिक्षा व मिनी डोअर चालक आणि मालक संघटनेचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले आणि आमदार आदिती तटकरे यांना वेळोवेळी निवेदने देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय माणगांव येथे झाल्यास दक्षिण रायगड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील वाहनचालक आणि मालक यांना लाभ मिळणार असल्याने पेण येथे जाण्यासाठी वणवण आणि पायपीट संपणार आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा, मुरुड, पाली सुधागड अशा ९ तालुक्यांना तसेच पेण आणि अलिबाग अशा २ तालुक्यांतील काही अंशी भागातील वाहन चालकांना लाभ मिळणार आहे. उर्वरित तालुके पनवेल येथे मुख्य प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जोडले आहेत. सध्या हे परिवहन कार्यालय पेण येथे असल्याने वाहनांची तपासणी आणि वाहनासंबधी कामांसाठी लांब अंतराचा पल्ला गाठण्यासाठी मजल दर मजल करत खड्ड्यातून तारेवरची कसरत करुन जावे लागते. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने पेण येथे जाताना वाहनांचे नुकसान झाल्यास परत फिरावे लागते. पेण पासून पोलादपूर, श्रीवर्धन १२५, महाड, म्हसळा १००, माणगाव, मुरुड, तळा ७५, रोहा, सुधागड ५० किलोमीटर इतके मोठे अंतर आहे. रिक्षाचालक हलाखीची असते. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाईलाजाने रिक्षा चालवून पोट भरीत असतो. त्यामुळे त्यांना पेण येथे जाताना खिसे रिकामे करून जावे लागते जर मध्यवर्ती अशा माणगाव येथे आर.टि.ओ. कार्यालय झाल्यास हेच निम्मे होऊन पैसे आणि वेळ यांची बचत होईल त्यामुळे जावळी येथील शासकीय वसतीगृहात तातडीने तात्पुरती दालने आणि कक्ष उपलब्ध करून देण्यात आली तर हे कार्यालय सुरू होऊ शकते असे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे यांनी सांगितले.
याबाबत पेण येथील उपप्रादेशिक सहायक परिवहन अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले की, माणगाव येथे आरटिओ कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालया प्रमाणे आधुनिक आणि अद्ययावत कार्यालय होणार आहे. यापूर्वीच वाहन पासिंग ट्रेकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. माणगाव येथे कॅम्प घेताना अडचणी येतात. सर्वांचीच गैरसोय होते. नवीन कार्यालय होण्यासाठी सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करु.