मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान भरती-ओहटीच्या वेळी जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतोय नाहक त्रास
अत्याधुनिक पद्धतीने बंदर परिसरातील चिखल, गाळ काढण्याची प्रवाशांची मागणी

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) उरण ते मुंबई जलप्रवास करताना प्रवाशी वर्गांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र ही समस्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देखील कोणतेही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशी वर्गा मध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. जलवाहतूक प्रवासात समुद्रातील चिखल, गाळ ही प्रमुख समस्या बनली आहे. चिखल व गाळामुळे अनेक जहाजे, बोटी चिखलात रुतत आहेत. यावर कोणतेही उपाययोजना होत नसल्याने जहाजे, होड्या सावकाश, मंद गतीने पुढे जात असल्यामुळे जल प्रवास आता सर्व प्रवांशासाठी आता डोकेदुखी बनली आहे. यावर त्वरित व कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गाने शासनाकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून केली आहे.
भरती- ओहटीच्या वेळी उरण ते मुंबई व मुंबई ते उरण जलप्रवास करताना प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास होतो. मोरा बंदरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे जलवाहतुक व औद्योगिक सहकारी संस्थेच्या बोटी ४ ते ५ तास बंद असतात आणि ते ही ५ ते ६ दिवस बंद असतात. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर कामावर पोहचता येत नाही महिन्यातुन ३ ते ४ वेळा लेट मार्क लागतात, तसेच १ ते २ नाहक खाडे होतात. महिन्यातुन दोनदा आमावस्या व पोर्णिमेला बोटिंचे वेळापत्रक बदलते. भाऊच्या धक्यावरून सुटलेल्या बोटी काहीवेळा मोरा बंदरात चिखलात अडकतात, त्यामुळे वेळेवर पोहचणाऱ्या प्रवाशांमध्ये व बोट चालकांमध्ये कधीतरी शाब्दीक वाद विवाद होतात. वेळापत्रक चुकल्याने बस, ट्रेन मिळत नाही, जास्त खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. अशा अनियमित वेळा पत्रकामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना त्रास होतो, तसाच त्रास आजारी व्यक्तीना, उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विदयार्थ्यांना, वयोवृद्धांना, लहान मुलांना तसेच महत्वाच्या कामाला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना त्रास होतो. अशी माहिती प्रवाशी दत्ता पुरो यांनी दिली आहे. मोरा बंदरा जवळचा चिखल गाळ नियमितपणे काढण्यात यावा तोही अत्याधुनिक पध्दतीने काढल्यास जास्त चिखल, गाळ राहणार नाही. अन्यथा बंदराची लांबी वाढवावी, जेणे करून प्रवाशांचा थोडा मानसिक त्रास कमी होण्यास मदत होईल.